देशभरात २४ तासात १४६ करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १३९७ वर जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२३८ जणांवर उपचार सुरु आहेत. १२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही संख्या जाहीर केली आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एका दिवसात ७२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या एका दिवसात २३० वरुन थेट ३०२ वर जाऊन पोहचली आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातली घोषणा मागच्या आठवड्यात केली होती. २१ दिवसांचा लॉकडाउन अर्थात १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.
देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यास सांगितलं आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. मात्र लोकांनी किराणा दुकानं, भाजी बाजार, मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी गर्दी किंवा झुंबड करु नये असंही आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. जे लोक लॉकडाउनचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र तशी वेळ आणू नका असंही आवाहन सरकारने केलं आहे.
करोनामुळे पूर्व आशिया व पॅसिफिकमध्ये १.१० कोटी लोकांची आर्थिक स्थिती बिकट होणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. जगात करोनाने ३७ हजार लोक मरण पावले असून ७ लाख ८० हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
सोमवारी वॉशिंग्टन येथील एका कर्जदार संस्थेने म्हटले आहे की, करोनाच्या आधीच्या एका अंदाजानुसार पूर्व आशिया व पॅसिफकमध्ये २०२० मध्ये ३.५ कोटी, तर चीनमध्ये २.५ कोटी लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार होती; परंतु करोनामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. एप्रिल २०२० साठीच्या अंदाजानुसार आता १.१० कोटी लोकांची आर्थिक स्थिती बिकट होणार आहे.
करोनाच्या संकटात सापडलेल्या अमेरिकेसाठी पुढचे तीस दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत सध्या १ लाख ६४ हजार निश्चित रुग्ण असून एकूण ३१०० बळी गेले आहेत.
सामाजिक अंतराचा निर्बंध ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या निर्णयानंतर त्यांनी सांगितले की, दोन आठवडय़ांत करोनाच्या साथीचा परमोच्च बिंदू साधला जाऊ शकतो त्यात मोठी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तीस दिवस अमेरिकेसमोर मोठे आव्हान आहे त्यामुळे सर्वानी सामाजिक अंतराचा निकष काटेकोरपणे पाळावा.
रोझ गार्डन येथून घेतलेल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सामाजिक अंतर राखण्याचा निकष ३० दिवस पाळावा, कारण आपण संयम ठेवला नाही तर हा विषाणू पसरत जाणार आहे. आज थोडा त्रास झाला तरी त्यामुळे आपण लवकर यातून बाहेर पडू.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं आहे.
उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडी अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रानं २५ हजार कोटींचं विशेष पॅकेज मंजुर करावं, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.