चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ मार्च २०२०

Date : 28 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात करोनाग्रस्तांची संख्या ८३४ वर
  • महाराष्ट्रात सहा नवे करोनाग्रस्त, रुग्ण संख्या ५९ - महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

  • पिंपरी-चिंचवडमधील पाच करोना बाधितांची पहिली टेस्ट निगेटिव्ह - पिंपरी-चिंचवडमधील पाच करोना बाधितांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. या सर्व रुग्णांवर भोसरी येथील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची १४ दिवसानंतर ची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉ. लक्ष्मण गोफने यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तीन करोनामुक्त तरुणांना घरी सोडण्यात आले आहे.

  • ‘करोना व्हायरस’मुळे जगभरात २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी , IMF प्रमुखांचा इशारा - “संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(IMF) प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलंय. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.

करोनाला झुंजवणाऱ्या चार प्रतिकारक पेशींचा शोध :
  • करोना विषाणूला मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणाली कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी केला असून त्यांच्या मते लहान मुलातील प्रतिसाद यात सर्वात प्रखर असतो व वृद्धांमधील प्रतिसाद सर्वात क्षीण असतो. करोना विषाणूचा मानवी शरीर नैसर्गिक पातळीवर प्रतिकार करताना प्रतिपंड तयार होत असतात त्यांचा अभ्यास केल्याने आता या विषाणूवर औषध शोधणे सोपे जाणार आहे.

  • करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील  संशोधकांनी केला असून त्यात रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे की, प्रथमच करोनाला मानवी प्रतिकारशक्तीकडून दिला जाणारा प्रतिसाद नोंदला गेला आहे.

  • मेलबर्न विद्यापीठातील पीटर डोहर्थी इन्स्टिटय़ूट फॉर इनफेक्शन अ‍ॅण्ड इम्युनिटी या संस्थेतील संशोधक कॅथरिन केडझिरन्स्का यांनी म्हटले आहे की, मानवी प्रतिकारशक्ती करोना विषाणूला जोरदार प्रतिसाद देत असते असे दिसून आले आहे. जे लोक दगावतात त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते.

  • एक महिला तीन दिवस बरीच आजारी दिसत होती पण नंतर ती व्यवस्थित बरी झाली. मध्यम तीव्रतेच्या आजारात तरी प्रतिकारशक्ती चांगली काम करताना दिसली आहे. जे लोक बरे झाले त्यांच्यात नेमके कुठले घटक प्रभावी ठरले व जे मरण पावले त्यांच्यात कुठले घटक कमी पडले याचा शोध घेण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून विषाणूतज्ञांना लस तयार करणे सोपे जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत साधला पुण्यातील हॉस्पिटल नर्सशी संवाद : 
  • जगभरात करोना व्हायरसचा विळखा पसरत चालला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. महाराष्ट्रात ही संख्या १४७ वर पोहचली आहे. सगळ्यांनी काळजी घ्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सगळेच दिग्गज नेते सांगत आहेत.

  • पुण्यातील नायडू रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयातील नर्स छाया यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन करोनाग्रस्तांसाठी सातत्याने कष्ट घेणाऱ्या नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर्स आणि इतर सगळ्यांचं मनोधैर्य उंचावणारा ठरला. हॅलो सिस्टर, नमस्ते तुम्ही कशा आहात? अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया यांच्याशी संवाद साधला.

केजरीवाल सरकारचे धोरण राबवण्याची राज्यांना सूचना : 
  • रोजंदारीवरील मजूर, बेघर, शहरी स्थलांतरितांना करोनामुळे दिल्लीत काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाची वानवा होऊ लागली आहे. अशा दिल्लीतील लाखो गरिबांना मोफत जेवण देण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केला. २१ दिवसांच्या टाळेबंदीत लोकांना खाद्यान्न मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना केली आहे.

  • रोजच्या जेवणाचीच भ्रांत पडल्याने शेकडो मजूर पायी आपापल्या गावी निघाले आहेत पण, अनेक मजुरांनी तेही शक्य नसल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गरिबांसाठी २३४ तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये जेवणाची मोफत सुविधा देण्यात आली असून शनिवारपासून २२५ सरकारी शाळांमध्ये ही सविधा उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली सरकारने दररोज २० हजार लोकांना मोफत जेवण पुरवले आहे. शुक्रवारी ही सुविधा २ लाख लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. शनिवारपासून ४ लाख गरिबांना दोन वेळचे जेवण मोफत दिले जाणार असल्याची माहिती अरिवद केजरीवाल यांनी दिली.

  • वेगवेगळ्या राज्यांमधून लोक दिल्लीत येऊन रोजंदारीवर काम करतात. टाळेबंदीमुळे त्यांच्याकडे काम नाही, पसाही नाही. या सर्व मजुरांना जेवण देण्याची जबाबदारी दिल्ली सरकारची असून ती पूर्ण केली जाईल. प्रत्येक शाळेमध्ये किमान ५०० लोकांना दोन वेळा जेवण दिले जाईल. धार्मिक संस्था, खासगी संस्था, नागरी संघटनांच्या माध्यमांतून दिल्लीतील गरीब उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे केजरीवाल म्हणाले.

२८ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.