दहावीचा निकाल 2018- मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच शुक्रवार 8 जून 2018 रोजी जाहीर होत आहे.
बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल पाहता येईल. तर SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे.
राज्यातील सुमारे 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. अपवादात्मक स्थितीत त्यामध्ये बदल होतो.
लखनऊ : योगी सरकार हे मायावती यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्याथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्ती ठेवल्या जाणार आहेत. या मोदी आणि योगी यांच्या मूर्ती अगदी खास पद्धतीने चित्रकूटच्या एका कलावंताने बनवल्या आहेत.
उत्तर प्रदेशात लोकसभा पोटनिवडणुकीतील दारुण पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांनी भाजप कार्यालयांमध्ये मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
परवा म्हणजे 5 जून रोजी योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा केला गेला. त्यावेळी त्यांना भेट देण्यात आलेल्या दोन मूर्तींचीही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातील एक मूर्ती उत्तर प्रदेशातील शक्तिशाली भाजप नेते म्हणून ओळख असलेल्या सुनील बन्सल यांनी दिली, तर दुसरी मूर्ती योगी आदित्यनाथ यांचे ओएसडी अभिषेक कौशिक यांनी दिली.
भगवे कपडे परिधान केलेली योगींची मूर्ती दस्तुरखुद्द योगी यांनासुद्धा प्रचंड आवडल्याचे समजते आहे. तिथे उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनाही या मूर्तींची प्रचंड स्तुती केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आदेश जारी करण्यात आला की, उत्तर प्रदेशातील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये योगी आणि मोदी यांच्या मूर्ती ठेवल्या जातील. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तर भाजपचे चार-चार-पाच-पाच कार्यलये आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला आहे. सलग दुसऱ्या वर्षी विराट कोहली बीसीसीआयचा 'क्रिकेटर ऑफ दि इयर' ठरला आहे.
2016-17 आणि 2017-18 च्या मोसमातील भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने विराटला गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बीसीसीआयने नुकतीच विराटच्या नावाची घोषणा केली.
बंगळुरुमध्ये 12 जूनला बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात विराटला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल.
याशिवाय महिला क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनाही सर्वोत्तम महिला क्रिकेटर पुरस्कारानं गौरवण्यात येईल.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला. यावेळी प्रणव मुखर्जींनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडली. संघाच्या मंचावरुन प्रणव मुखर्जींनी देशभक्तीचे धडे दिले.
वसुधैव कुटुंबकम् हीच भारताची खरी ओळख असल्यामुळे सर्वांसाठी देशाचे दरवाजे कायम खुले असल्याचं प्रणव मुखर्जींनी सांगितलं. हिसेंच्या बातम्या रोज येत असल्याचं सांगून मुखर्जींनी अप्रत्यक्षपणे भाजपला सुनावलं.
डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र असल्याचं प्रणव मुखर्जी यांनी डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर नोंदवहीत लिहिलं.
प्रणव मुखर्जींसाठी पहिल्यांदाच संघाच्या परंपरेला छेद देण्यात आला. दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आधी भाषण करतात, त्यानंतर सरसंघचालकांचं संबोधन होतं. मात्र यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधी भाषण केलं, तर शेवटी प्रणव मुखर्जींनी उपस्थितांना संबोधित केलं.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण का दिलं, ते त्यांनी का स्वीकारलं, यावरुन वाद निर्माण करणं निरर्थक असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात झाली आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या मालिकेसाठी या संघाची निवड करण्यात आली आहे.
भारतीय युवा संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 2 चार दिवसीय आणि 5 वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अर्जुनची भारतीय युवा संघात वर्णी लागली आहे. पण वन डे संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही.
18 वर्षीय अर्जुन हा धरमशाला इथे नुकत्याच झालेल्या 25 खेळाडूंच्या सराव शिबिरात सहभागी झाला होता. या शिबिरातील कामगिरीच्या आधारावर भारताचा हा संघ निवडण्यात आला. दिल्लीचा विकेटकीपर फलंदाज अनुज रावतकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
अष्टपैलू म्हणून संघात अर्जुनची भूमिका महत्त्वाची असेल. फलंदाजीसोबतच डावखुरा जलदगती गोलंदाज म्हणून अर्जुनने चांगली कामगिरी बजावली आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघात खेळला आहे.
भारताच्या अंडर नाईन्टिन संघाचं प्रशिक्षकपद वूर्केरी रमणकडे देण्यात आलं आहे. राहुल द्रविड भारत अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने अर्जुनचे नवे गुरुजी वूर्केरी रमण असतील.
नवी दिल्ली- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन पुढील महिन्यात भारतात येणार आहेत. त्यांच्या भारतभेटीची तारिख निश्चित झाली नसली तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते भारताच्या दौऱ्यावर येतील असे सांगण्यात येत आहे. गेल्याच महिन्यात भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्हीके सिंह उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. सुमारे 20 वर्षांनंतर त्यांच्या रुपाने भारतातील एका उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली.
त्याचबरोबर भारताने उत्तर कोरियामध्ये राजदुताची नेमणूकही केली. भारत आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये नव्याने संबंध प्रस्थापित होत असण्याच्या पार्श्वभूमीवर आता दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत असल्याने त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मे महिन्यात जनरल व्ही के सिंह यांनी उत्तर कोरियाच्या सर्वोच्च संसदेचे उपाध्यक्ष किम योंग डाए, परराष्ट्र मंत्री री योंग हो, परराष्ट्र उपमंत्री चोए हुइ चोल, सांस्कृतीक मंत्री पाक चुन नाम यांची भेट घेतली होती आणि राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक सहकार्यावर चर्चा केली होती. त्यापुर्वी काहीच दिवस उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन यांची ऐतिहासिक भेट झाली होती.
शीतयुद्धाच्या प्रदीर्घ काळानंतर या दोन्ही देशांमध्ये संवादाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर आता 12 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये भेट होणार आहे.
जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन / जागतिक महासागर दिन
महत्वाच्या घटना
१७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.
१९१८: नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
१९४१: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४८: जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.
१९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
२००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
जन्म
१९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३)
१९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)
१९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००८)
१९२५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बार्बरा बुश यांचा जन्म.
१९३६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.
१९५५: वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म.
१९५७: भारतीय चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.
१९७५: भारतीय चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा जन्म.
मृत्यू
१७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५)
१८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १७३७)
१८४५: अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष अॅन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १७६७)
१९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.
१९९८: नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.