चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ सप्टेंबर २०१९

Date : 13 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे करणार भाजपात जाहीर प्रवेश :
  • राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं आहे.

  • ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”,

  • आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.

  • मिळालेल्या माहितीनुसार, भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.

बँक कर्मचारी संपावर जाणार; चार दिवस कामकाज राहणार ठप्प :
  • सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस बँका चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला आहे. चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 10 सरकारी बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारने 10 बँकांचे विलिनिकरण करून 4 मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही बँक कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाऊ शकतात, असं बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. कामाचा आठवडा सहा ऐवजी पाच दिवसांचा करण्याची मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC) आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या संघटनांनी संपाची घोषणा केली आहे.

  • 26 सप्टेंबर रोजी गुरूवार आणि 27 सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे. या दिवशी संप पुकारल्यामुळे बँकांचं कामकाज ठप्प राहणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे बँकांचं कामकाज बंद असेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 27 सप्टेंबर मध्यरात्री पर्यंत संपावर जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात आणि आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘एसआयबीओसी’चे (चंदीगड) महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी दिली.

बुलेट ट्रेनचे दर विमानाच्या तिकिटापेक्षाही महाग; वेळही जास्त लागणार :
  • गुरूवारी ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या (एनएचएसआरसीएल) एका अधिकाऱ्यानं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकिटांच्या दराबाबत माहिती दिली. या मार्गावरील प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला जवळपास 3 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. परंतु हे बुलेट ट्रेनच्या तिकिटाचे दर हे विमानाच्या तिकिटांच्या दरापेक्षाही महाग असल्याचे दिसत आहे. मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी विमानासाठी जवळपास 2 हजार 200 रूपये मोजावे लागतात. तसंच हे अंतर कापण्यासाठी 1 तास 15 मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु बुलेट ट्रेनने हे अंतर कापण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागणार आहे.

  • ‘एनएचएसआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन योजनेबद्दल माहिती दिली. “बुलेट ट्रेनसाठी आम्हाला 1 हजार 380 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यामध्ये खासगी, सरकारी, वन आणि रेल्वेच्या जमिनींचा समावेश आहे. आतापर्यंत 622 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. तसंच डिसेंबर 2023 ची मर्यादा ध्यानात ठेवून आम्ही काम करत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं. बुलेट ट्रेन पूर्ण झाल्यानंतर सकाळी 6 ते रात्री 12 यावेळेत मुंबई ते अहमदाबाद 35 आणि अहमदाबाद ते मुंबई 35 अशा 70 फेऱ्या होणार असून यासाठी जवळपास 3 हजार रूपये तिकिट दर आकारला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

  • बुलेट ट्रेनसाठी निविदा जारी करण्यात आल्या असून निर्मिती कार्य मार्च 2020 पासून सुरू होण्याची शक्यता खरे यांनी व्यक्त केली. बुलेट ट्रेन योजना पूर्ण होण्यासाठी तब्बल 1.08 लाख कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून डिसेंबर 2023 पर्यंत बुलेट ट्रेन पूर्ण करण्याचा मानस आहे. मुंबई ते अहमदाबाद 508 किलोमीटरचे अंतर असून यादरम्यान 12 स्थानकं असणार आहेत. सध्या ठरवण्यात आलेले बुलेट ट्रेनचे दर आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ हा विमानापेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे.

जम्मू-काश्मीर भारतातील राज्य; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली :
  • नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन गेली 72 वर्ष खोटं बोलणाऱ्या पाकिस्तानची जगासमोर पोलखोल झाली आहे. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या बैठकीसाठी गेलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी बोलण्याच्या ओघात जम्मू काश्मीर भारतातील राज्य असल्याचं म्हटलं आहे.

  • जम्मू काश्मीरमधील कमल 370 मधील तरतुदी हटवल्यानंतर पाकिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना कुरेशी यांनी असं म्हटलं आहे. "जम्मू काश्मीरमधील जनजीवन सुरळीत असल्याचं भारत जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधील जनजीवन सुरळीत झालं आहे तर आंतरराष्ट्रीय मीडिया, एनजीओ, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सामाजिक संस्था यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यास मनाई का आहे?" असं कुरेशी यांनी विचारलं.

  • काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा प्रचार कुरेशी यांनी यावेळी केला. तसेच परिषदेने काश्मीरमधील मानवाधिकाराकडे लक्ष द्यावे आणि मानवाधिकाराच्या होणाऱ्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणीही कुरेशी यांनी केली.

दिल्लीत ४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीसाठी Odd-Even चा नियम, प्रदूषण नियंत्रणासाठी केजरीवाल सरकारचा निर्णय :
  • नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत वाहतुकीसाठी पुन्हा एकदा Odd-Even नियम लागू करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. 4 ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीतील वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळात दिल्लीतील जनतेला सरकारकडून प्रदुषणापासून बचावासाठी मास्क देखील वाटण्यात येणार आहे.

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या नियमानूसार वाहनाच्या नंबर प्लेटवरील शेवटचा आकडा ऑड(1,3,5,7,9) असेल तर महिन्याच्या 5,7,11,13 आणि 15 तारखेला वाहन चालवता येणार आहे. तर वाहनाच्या नंबर प्लेटवरील शेवटचा आकडा इवन(2,4,6,8) असेल तर महिन्याच्या 4,6,8,10,12,14 तारखेला गाडी चालवता येणार आहे.

  • तसेच दिवाळीच्या निमित्ताने फटाके न फोडण्याचं देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दिल्लीतील प्रदुषणावर नियंत्रणासाठी केजरीवाल सरकारकडून 'विंटर अॅक्शन प्लान' तयार करण्यात आला आहे. यामध्ये ऑड-इवन वाहतूक नियमासह मोफत मास्क, कचरा जाळण्यास प्रतिबंध, प्रदूषणमुक्त दिवाळी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र दिल्लीत ऑड-इवनची गरज नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही बनवलेल्या रिंग रोडमुळे दिल्लीतील प्रदूषण बरेच कमी झाले आहे. येत्या 2 वर्षात ते आणखी कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.

  • १९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

  • १९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.

  • १९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.

  • १९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.

  • १९९६: श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.

  • २००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

  • २००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

  • २००८: दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.

जन्म

  • १८५२: नामाकिंत शिक्षक, संस्कृत पंडित गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म.

  • १८५७: द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्शे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९४५)

  • १८६५: भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल विल्यम बर्डवुड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९५१)

  • १८८६: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७५)

  • १८९०: मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९७८)

  • १९३२: शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.

  • १९६७: अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म.

  • १९६९: ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न यांचा जन्म.

  • १९७१: क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू गोरान इव्हानिसेव्हिच यांचा जन्म.

  • १९७६: न्झीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रेग मॅकमिलन यांचा जन्म.

  • १९८०: भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्म.

मृत्यू

  • १८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८३८)

  • १९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)

  • १९२९: क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)

  • १९७१: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्‍नागिरी, महाराष्ट्र)

  • १९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)

  • १९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)

  • १९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष  डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)

  • १९९७: प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९३०)

  • २००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२५)

  • २०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.