वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उबर कंपनीचे सीईओ आणि संस्थापक ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
महिला कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांवर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे ट्रॅव्हिस हे अचानकपणे सुट्टीवर गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता.
अमेरिकेतील वृत्तपत्र असलेल्या न्यूयार्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उबर कंपनीचे सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी राजीनामा दिला असून त्यांनी कंपनीला 'राम-राम' ठोकला आहे.
सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनेने हे वृत्त देताना म्हटले की, सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत.
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहेत.
खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू न शकलेल्या एअर सिंगापूर एअरलाइन्स आणि मलेशियाची एअर एशिया यांच्या भागीदारीत अनुक्रमे ‘विस्तारा’ व ‘एअर एशिया इंडिया’ कंपन्या सुरू करून, टाटा समूह भारताच्या नागरी विमान वाहतूक उद्योगात शिरला आहेच.
राज्यातील नऊ जिल्ह्यांतील १० जलसिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पांद्वारे राज्यातील १ लाख १६ हजार ३८६ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
तिलारी आंतरराज्य प्रकल्प सिंधुदुर्ग ६६५६ व गोवा १४,५२१ हेक्टर, उर्घ्व प्रवरा प्रकल्प अहमदनगर नाशिक, सांगोला शाखा कालवा पुणे, सातारा व सोलापूर, अजुर्ना मध्यम प्रकल्प रत्नागिरी, रापापूर लापा प्रकल्प नंदुरबार, चिंचपाणी लापा प्रकल्प जळगाव, बबलाद कोपबं सोलापूर, सोरेगांव लापा प्रकल्प सोलापूर, दरिबड लापा प्रकल्प सांगली, पिंपळगांव खांड लापा प्रकल्प अहमदनगर अशा एकूण १० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असणार हे आज निश्चित होणार आहे. यासाठी १७ विरोधी पक्षांची आज बैठक पार पडणार आहे.
एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसने कोविंद यांना पाठिंबा देण्यास नकार दिला असून काँग्रेस स्वतंत्र उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीत उतरवणार आहे.
एनडीएचे राष्ट्रपतीपाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असल्याने काँग्रेसही दलित उमेदवारच पुढे करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांची नावं चर्चेत आहेत.
त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून आज कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडेच सर्वांच लक्ष आहे.
गुजरातमध्ये विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत (एसईझेड) हे प्रकल्प उभे राहणार आहेत.
चीनमधील सर्वात मोठ्या खासगी कंपनीपैकी एक असलेल्या ईस्ट होप समूहासोबत भारताच्या अदानी समूहाने ३० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केला. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत.
शांघाई येथील भारतीय वाणिज्यदूतांनी सांगितले की, अदानी आणि ईस्ट होप यांच्यातील करारानुसार, गुजरातच्या मुंद्राक विशेष आर्थिक क्षेत्रात सौरऊर्जा उत्पादन उपकरण, रसायन, अॅल्युमिनियम आणि पशुखाद्यनिर्मिती संच उभारण्यात येणार आहेत.
तसेच उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी ईस्ट होप समूहाचा इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रियल विभाग कार्यरत असणार आहे.
गेट वे ऑफ इंडियाजवळच्या 'ताज महाल पॅलेस' हॉटेलच्या बिल्डिंगला 'ट्रेडमार्क'चा दर्जा मिळाला आहे.
न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूंच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल पॅलेसही जाऊन बसला आहे.
११४ वर्षं जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील एकमेव वास्तू आहे.
एखाद्या ब्रँडचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे ब-याचदा ट्रेडमार्क होत असतात.
भारतात ट्रेडमार्क अॅक्ट १९९९ पासून लागू करण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस या हॉटेलच्या बिल्डिंगला ट्रेडमार्कचा दर्जा देण्यात आला आहे.
भारत लोकसंख्येच्या बाबतीत २०२४ पर्यंत चीनला मागे टाकू शकतो. २०३० पर्यंत भारताची लोकसंख्या दीडशे कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्राकडून ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाने २०१७ मधील लोकसंख्येची समीक्षा करुन अहवाल तयार केला आहे.
सध्या चीनची लोकसंख्या १४१ कोटी इतकी आहे. तर भारताची लोकसंख्या १३४ कोटी इतकी आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १९ टक्के लोक चीनमध्ये, तर १८ टक्के लोक भारतात राहतात, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
भारत २०२४ च्या आसपास चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल, अशी शक्यता संयुक्त राष्ट्रने अहवालातून आकडेवारीसह व्यक्त केली.
जागतिक दिवस
फाशीवाद विरोधी आंदोलन दिन : क्रोएशिया.
शिक्षक दिन : एल साल्वादोर.
जन्म, वाढदिवस
डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक : २२ जून १९०८
वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू : २२ जून १९३५
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ : २२ जून १९४०
डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ : २२ जून २००१
ठळक घटना
सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरणागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले : २२ जून १९४०
चार्ल्स रँड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या : २२ जून १८९७
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.