बेन गुरियन - भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. सौदी अरेबियाने इस्राइलला जाणाऱ्या विमानांना आपल्या आकाशाचा वापर करू देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतातून इस्राइलला जाणाऱ्या आणि इस्राइलहून भारताकडे जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून प्रवास करण्याची परवानगी देण्याचे संकेत सौदी अरेबियाने हल्लीच दिले होते. एअर इंडियाचे 139 विमान तब्बल साडे सात तासांचा प्रवास करून गुरुवारी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. सौदी अरेबियाच्या धोरणात आलेला हा मोठा बदल आहे.
इराण आणि सौदी अरेबियामध्ये असलेले तणावपूर्ण संबंध हे सौदीच्या इस्राइलकडे झुकण्याचे कारण मानले जात आहे. "हा खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर हे शक्य झाले आहे,"अशी प्रतिक्रिया इस्राइलचे पर्यटनमंत्री यारिव लेविन यांनी दिली.
लेविन म्हणाले, "सौदीच्या आकाशातून भारतीय विमानांची ये जा वाढल्याने प्रवासातील वेळ कमी होईल. त्यामुळे प्रवासातील वेळ सुमारे दोन तासांनी कमी होईल. याशिवाय तिकिटांचे दरही कमी होतील." ज्यू बहुसंख्य असलेल्या इस्राइलला इस्लामिक देशांकडून राष्ट्राचा दर्जा मिळालेला नाही. मात्र सध्या सौदी अरेबियाने दिलेली सवलत ही केवळ भारतीय विमानांसाठी आहे. इस्राइली विमानांसाठी अशी सवलत देण्याचे कोणतेही संकेत सौदीकडून देण्यात आलेले नाहीत.(source :lokmat)
नवी दिल्ली - गेल्या काही काळात सरकारकडून विविध ओळखपत्रे आणि शासकीय योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता निवडणूक आयोगही मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मतदार कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याचा आमचा विचार आहे. मात्र आधार कार्ड अनिवार्य करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
फेसबूकवरून झालेल्या डाटाचोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपले मत मांडले. त्यावेळी त्यांनी मतदार कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याचा मुद्दा मांडला."मतदार कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याचा आमचा विचार आहे. मात्र आधार कार्ड अनिवार्य करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
तसेच सध्या फेसबूकवरून झालेल्या डाटाचोरीच्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, "नव्या तंत्रज्ञानासोबत फुंकून पावले टाकण्याची गरज आहे. यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत असून, त्यातून कोणत्याप्रकारचा धोका उदभवू शकतो, तसेच त्याला कसे रोखता येईल याबाबची चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात येईल.
या संदर्भात आम्ही मतदारांना माहिती देणे सुरू ठेवू. तसेच सोशल मीडिया धोरणही कायम राहणार आहे," या प्रकरणी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे अद्याप कुठलीही तक्रार आली नसल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. सध्या फेसबूक डाटा लीक प्रकरणावरून रणकंदन सुरू असून, काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत..(source :lokmat)
मुंबई : कोल्हापूरची अंजना तुरंबेकर हिने आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनची ए लायसन्स कोचिंग परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी अंजना ही महाराष्ट्राची पहिली महिला ठरली आहे.
देशभरात याआधी सातच महिलांना फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ए लायसन्स मिळवता आलं होतं. त्यामुळे अंजनाने ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक म्हणून मिळवलेलं यश कौतुकास्पद ठरलं आहे. अंजना ही मूळची कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातल्या बेकनाळ गावची आहे.
अंजनाने एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. फिफाच्या अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाच्या कालावधीत मिशन इलेव्हन मिलियन या मोहिमेची तांत्रिक प्रमुख म्हणूनही तिनं काम पाहिलं आहे.
आता ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक या नात्यानं अंजना तुरंबेकरला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा व्यावसायिक संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मिळू शकते.(source :abpmajha)
नागपूर : क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधी (डॉट्स) घेत नाही किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) आणि त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) होतो. गेल्या ११ वर्षात नागपूर विभागात ‘एमडीआर’चे १३१९ रुग्ण तर ‘एक्सडीआर’चे ५३ रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण २५ ते ३४ वयोगटातील आहेत.
सध्या क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून, देशात प्रत्येक वर्षी २९ लाख जणांना नव्याने या संसर्गजन्य रोगाची लागण होते. महाराष्ट्रात २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील १ हजार रुग्णांना पुरेसा उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
गरीब नागरिकांमध्ये पुरेसे उपचार आणि कुपोषण यामुळे क्षयरोगाचे प्रमाण जास्त असून, देशात प्रत्येक वर्षी सरासरी ४.२० लाख गरीब नागरिकांना क्षयरोगाची बाधा होत आहे. यातही जे रुग्ण व्यवस्थित औषध घेत नाही किंवा अर्धवट औषध घेतात त्यांना ‘एमडीआर’ व नंतर ‘एक्सडीआर’ला सामोरे जावे लागत आहे. हे एक नव्हे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे.(source :lokmat)
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या विविध १४ कॅटेगिरीतून विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाची घोषणा झाली असून, त्यात राजकारण, साहित्य, कला, नाट्य, वैद्यकीय, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे या वर्षीही ज्युरींच्या बैठकीत विचारांची जुगलबंदी रंगणार, हे निश्चित आहे.
‘लोकमत’ ऐडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या वर्षीच्या ज्युरींमध्ये, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री आणि साहित्य, शिक्षण, राजकारण या विविध क्षेत्रांचा दांडगा अभ्यास असणारे प्रकाश जावडेकर, महाराष्टÑाच्या राजकारणात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करणारे, केंद्रात पंतप्रधान कार्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सदस्य आहेत.
‘पद्मश्री’ पुरस्काराने नुकताच ज्यांचा सन्मान झाला असे, गडचिरोलीसारख्या भागात निष्ठेने अनेक वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, टाटा हॉस्पिटलमध्ये आपल्या प्रयोगशील कामांतून स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी खूप मोठे काम उभे करणारे पद्मश्री
डॉ. राजेंद्र बडवे आणि स्वत:च्या वैचारिक भाषणांनी वेगळा श्रोतावर्ग निर्माण करणारे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार तथा विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर हेही या ज्युरी मंडळात आहेत.(source :lokmat)
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत.
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्क यांना फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनी देखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला दणका दिला.
‘आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा आम्ही त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला मोठा फटका बसेल असे काही नाही, असंही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या फेसबुकवरील पेजला लाखो युजर्सनी लाईक केले होते.(source :loksatta)
जागतिक क्षयरोग दिन
महत्वाच्या घटना
१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
१८३७: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.
१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
१९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.
जन्म
१७७५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५)
१९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै१९७१)
१९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)
१९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.
१९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.
मृत्यू
१८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०)
१८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)
१९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)
२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी१९१३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.